पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला.
सावरकर स्मारक येथे शीख बांधवांनी जल्लोष केला. ढोलाच्या तालावर भांगडा नृत्य सादर करत, ‘बार बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, अशा घोषणा देत, त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही सरबत वाटप करून, या आनंदात सहभागी करुन घेण्यात आले.
या वेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक आदित्य माळवे, वृक्ष संवर्धन समिती सदस्य संदीप काळे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दत्तात्रेय खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात संदीप खर्डेकर, चरणजीतसिंग सहानी, दिलीप उंबरकर, सतीश गायकवाड, शरणजीतसिंग बग्गा, यशराज शेट्टी यांचा सहभाग होता.
या वेळी बोलताना योगेश गोगावले म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीस देशवासीयांनी पसंती दिली व त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमत दिले. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेबरोबरच नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका विश्वास’ या घोषणेला प्रत्यक्षात उतरवायचे आहे आणि मोदींच्या स्वप्नातील विकासपर्व गाठायचे आहे.’
प्रदीप रावत म्हणाले, ‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार भाजप करते. त्यांच्या स्मारक स्थळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त जल्लोष केला जात आहे. हा अपूर्व संयोग असून, ज्या प्रकारचे राजकारण स्वातंत्र्यानंतर अपेक्षित होते ते सुशासन नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले.’
‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षा सहन करावी लागते त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन होत असल्याने या स्मारकाच्या ठिकाणी हा जल्लोष आयोजित केला आहे,’ असे आयोजक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
हेही जरूर वाचा :